MR/Prabhupada 0314 - बाह्य शरीराकडे खूपच जास्त लक्ष नाही, परंतु जीवात्म्याकडे पूर्ण लक्ष देणे

Revision as of 23:46, 28 June 2018 by Parth (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0314 - in all Languages Category:MR-Quotes - 1975 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 6.1.10 -- Los Angeles, June 23, 1975

या कलियुगात, भांडण, संघर्ष व गैरसमजाच्या युगात - याला कलियुग म्हणतात - या युगात केवळ एकच साधन आहे : हरिकीर्तनात्. हे संकीर्तन आंदोलन म्हणजेच हरिकीर्तन. हरिकीर्तन... कीर्तन म्हणजे भगवंतांच्या यशाचे गुणगान करणे, हरिकीर्तन. आणि याची श्रीमद्भागवतातही पुष्टी केलेली आहे :

कलेर्दोषनिधे राज-
न्नस्ति ह्येको महान् गुणः ।
कीर्तनादेव कृष्णस्य
मुक्तसङ्गः परं व्रजेत् ।।
(श्री. भा. १२.३.५१)

त्यामुळे हेच सुचवले आहे, आणि त्याचप्रमाणे, श्री चैतन्य महाप्रभूंबद्दलही श्रीमद्भागवतात एक विधान आहे : त्विषाकृष्णम्...

कृष्णवर्णं त्विषाकृष्णं
साङ्गोपाङ्गास्त्रपार्षदम् ।
यज्ञैः सङ्कीर्तनप्रायै-
र्यजन्ति हि सुमेधसः ।।
(श्री. भा. ११.५.३२).

त्यामुळे, चैतन्य महाप्रभूंची पूजा करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. आपण त्यांचा श्रीविग्रह ठेवतो. सर्वप्रथम आपण आपले नमस्कार चैतन्य महाप्रभू व त्यांच्या पार्षदांना समर्पित करतो, आणि त्यानंतर, गुरुगौरांग, आणि त्यानंतर आपण आपले नमस्कार राधाकृष्ण किंवा भगवान जगन्नाथ यांना समर्पित करतो. कारण ही या कलियुगासाठीची पद्धत आहे, यज्ञैः सङ्कीर्तनप्रायैर्यजन्ति हि सुमेधसः, जर तुम्ही भगवान चैतन्यांसमोर तुम्हाला जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा हे संकीर्तन करणार, तर तुम्ही निश्चितच सफल होणार. तुम्हाला दुसरी कोणतीही गोष्ट करण्याची आवश्यकता नाही.

हेच सुचविले आहे : यज्ञैः सङ्कीर्तनप्रायैर्यजन्ति हि सुमेधसः । त्यामुळे जे लोक बुद्धिमान आहेत, ते आत्म-साक्षात्काराच्या या सोप्या पद्धतीचे अनुसरण करतात. तुम्ही जितक्या जास्त वेळा संकीर्तन करणार, तितक्या चांगल्या प्रकारे तुमचे हृदय शुद्ध व पवित्र होईल. चेतोदर्पणमार्जनम् (चै. च. अन्त्य २०.१२). हेच सुचविण्यात आले आहे. चेतोदर्पण... हेच पहिले पाऊल आहे, कारण या चेतोदर्पणमार्जनम् शिवाय, आपले हृदय स्वच्छ झाल्याशिवाय, आपल्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होत नाही. जर तुम्ही हरेकृष्ण महामंत्राचे अत्यंत आनंदाने कीर्तन कराल, तर त्याचा सर्वप्रथम फायदा हा असेल की तुमचे हृदय स्वच्छ होईल. मग तुम्हाला कळेल तुमचे स्वरूप काय आहे, तुम्ही काय आहात, तुमचे कार्य काय आहे. जर तुमचे हृदय अशुद्ध असेल, तर... त्यामुळे तुमच्या हृदयाची अशुद्धता केवळ प्रायश्चित्ताने दूर होणार नाही. ते अशक्य आहे. त्यामुळेच... परीक्षित महाराज फार बुद्धिमान आहेत. ते म्हणतात, प्रायश्चित्तमथो अपार्थम्. अप, अप म्हणजे "चुकीचा", आणि अर्थम् म्हणजे "अर्थ." "त्याला काहीही अर्थ नाही." ते तात्काळ या निरर्थक प्रायश्चित्ताच्या प्रक्रियेचा त्याग करतात. "त्याने कोणता फायदा होणार आहे? मनुष्य तरीही अशुध्दच राहतो. त्याच्याने त्याच्या हृदयाचे अंतरंग शुद्ध होत नाही." त्याच्या अंतर्मनात अनेक घाणेरड्या गोष्टी आहेत: "मी कशाप्रकारे यांना फसवू शकतो, मी काळाबाजार कसा करू शकतो, मी माझ्या इंद्रियांचा उपभोग कसा घेऊ शकतो, मी कशाप्रकारे वेश्येकडे जाऊ शकतो व मद्य पिऊ शकतो." या सर्व गोष्टी भरलेल्या असतात. त्यामुळे केवळ मंदिरात किंवा चर्चमध्ये जाऊन थोडेसे प्रायश्चित्त केल्याने काहीही होणार नाही. त्याला या संकीर्तन प्रक्रियेचा मनःपूर्वक अंगीकार करावा लागेल.

चेतोदर्पणमार्जनं भवमहादावाग्निनिर्वापणम् । (चै. च. अन्त्य २०.१२) त्याचा पहिला फायदा हा आहे की तुमचे हृदय स्वच्छ होईल. दुसरा फायदा आहे भवमहादावाग्निनिर्वापणम्. जर तुमचे हृदय शुद्ध झाले, तर या संसारात तुमचे स्थान काय आहे हे तुम्ही जाणू शकणार. आणि अशुद्ध हृदयाने मात्र नाही जाणता येणार. जर तुमचे हृदय स्वच्छ असेल, तर तुम्ही समजू शकाल की "मी हे शरीर नाही. मी जीवात्मा आहे. मग मी खरोखर स्वतःसाठी काय करीत आहे? मी जीवात्मा आहे. मी हे शरीर नाही. मी या संपूर्ण शरीराला साबणाने घासत आहे, पण माझी मात्र उपासमार होत आहे. भौतिकवादी संस्कृतीतील लोक त्यांच्या शरीराची काळजी घेत आहेत मात्र त्यांना त्या शरीरात असलेल्या जीवात्म्याची काहीच खबर नाही. याला म्हणतात भौतिकवादी समाज. आणि आपला कृष्णभावनामृत संघ म्हणजे, या बाह्य शरीराकडे खूपच जास्त लक्ष नाही, मात्र जीवात्म्याकडे पूर्ण लक्ष देणे. हे आहे कृष्णभावनामृत, पूर्णपणे वेगळे. त्यामुळे ते या आंदोलनाला समजून घेऊ शकत नाही. हे पूर्णपणे आध्यात्मिक आंदोलन आहे. हे काही भौतिक आंदोलन नाही. त्यामुळे त्यांना काही वेळा असा गैरसमज होतो की, "तुम्ही लोक आरोग्याने दुबळे आहात. ते असे बनत आहेत, ते तसे बनत आहेत. ते मांस खात नाहीत, त्यामुळे त्यांच्यात शक्ती कमी आहे." मग, "आम्ही बाह्य शारीरिक शक्तीबद्दल इतका विचार करीत नाही. आम्ही आध्यात्मिक जीवनाशी संबंधित आहोत." त्यामुळे ते काही वेळा गैरसमज करून घेतात. तर मग, लोक समजून घेवोत अथवा न घेवोत, ते तितके महत्त्वाचे नाही. तुम्ही तुमचे कीर्तन चालू ठेवा व ही खात्री करा की तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा भौतिकवाद अस्तित्वात नाही. खूप खूप धन्यवाद.