MR/Prabhupada 0308 - आत्म्याचे कार्य कृष्णभावनामृत आहे



Lecture -- Seattle, October 2, 1968

तरुण (२) : मनाला प्रशिक्षित कसे केले जाते?

प्रभुपाद : हे प्रशिक्षणच आहे. तुम्ही केवळ कृष्णभावनेच्या कार्यांत मग्न व्हा. हे अगदी व्यावहारिक आहे. जसे की कीर्तन, दहा वर्षाचा मुलगा, तोसुद्धा सम्मिलित आहे. त्याचे मन हरेकृष्ण या ध्वनीवर एकाग्र झाले आहे. त्याची अन्य इंद्रिये, पाय व हात, ती कार्य करीत आहेत, नृत्य करीत आहेत. याप्रकारे आपण आपले मन, आपली इंद्रिये सदैव कृष्णभावनेत कार्यरत ठेवायला हवीत. ते तुम्हाला परिपूर्ण बनवेल. आणि ते कोणासाठीही शक्य आहे. तुम्हाला एका जागी बसून कशाचेतरी कृत्रिमपणे ध्यान करण्याची आवश्यकता नाही. ज्याक्षणी तुम्ही हरेकृष्ण या नावांचे कीर्तन करता, त्याक्षणीच तुमचे मन आपसूकच एकाग्र होते, क्षणार्धात तुम्ही कृष्णांचे, त्यांच्या शिकवणींचे, कृत्यांचे स्मरण करतात. त्यासाठी सरावाची आवश्यकता असते.

तरुण (२) : कारण, उदाहरणार्थ, आपण सूर्याची किरणे आहोत...

प्रभुपाद : होय.

तरुण (२) : आपण स्वतःबद्दल विचार करू शकता?

प्रभुपाद : का नाही? आपण विशिष्ट व्यक्ती आहोत.

तरुण (2) : आणि जेव्हा तुम्ही विचार करत असता, तेव्हा तुम्ही कृष्णांचा विचार करत असता का?

प्रभुपाद : जरी आपण सूक्ष्म आहोत, तरी आपण विशिष्ट व्यक्ती आहोत. आपल्यात विचार, भावना, इच्छा, या सर्व क्षमता आहेत. आपण ते करत आहोत. आपण विशिष्ट व्यक्ती आहोत. तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेने येथे आला आहात. तुम्हाला कोणीही बळजबरी केलेले नाही. जर तुम्हाला वाटेल, तर तुम्ही जाऊ शकता. कोणी येथे येते, कोणी कधीच येत नाही, कोणी दररोज येते. का? जरी तुम्ही सूक्ष्म असाल, तरी तुम्ही विशिष्ट व्यक्ती आहात. या बद्ध अवस्थेतही तुम्ही स्वतंत्र आहात, खूप स्वतंत्र. जेव्हा तुम्ही मुक्त, शुद्ध जीवात्मा असता, तुम्हाला माहीत नाही तेव्हा तुम्ही किती जास्त स्वतंत्र असता. तुम्ही सूक्ष्म आहात हे महत्त्वाचे नाही, परंतु तुम्ही दिव्य तेजःकण आहात. तुम्हाला समजत नाही की हा लहानसा दिव्य तेजःकण ज्याला कोणताही चिकित्सक, वैद्यकीय शास्त्रज्ञ शोधू शकत नाही, हा आत्मा कोठे आहे, पण आत्मा आहे. ती एक वस्तुस्थिती आहे. ज्याक्षणी तो आत्मा या शरीराला सोडून जातो, ते निरुपयोगी होते. शोधा कोणता आहे तो महत्त्वपूर्ण तेजःकण. ते शक्य नाही, कारण तो अतिशय सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म, की तुमचे भौतिक डोळे किंवा सूक्ष्मदर्शक किंवा इतर कोणत्याही दर्शकाने तुम्ही त्याला शोधू शकत नाही. त्यामुळे ते म्हणतात आत्मा अस्तित्वात नाही. पण ते स्पष्ट करू शकत नाहीत (मृत शरीरातून) काय गेले आहे ते. तो सूक्ष्म असा आत्म्याचा कणही इतका शक्तिशाली आहे की तो जोपर्यंत या शरीरात आहे, तो त्या शरीराला ताजेतवाने व सुंदर ठेवतो. आणि ज्याक्षणी तो सोडून जातो, त्याक्षणीच शरीर विघटित व्हायला लागते. पहा. अगदी एखाद्या औषध, किंवा इंजेक्शनप्रमाणे. एक लहानशी गोळी, ती निरोगी ठेवते. ते काहीसे तसेच आहे, खूपच शक्तिशाली आहे. तुम्हाला माहीत नाही त्या आत्म्याची ताकद काय आहे ते. ते तुम्ही समजून घ्यायला हवे. मग त्यास आत्मसाक्षात्कार म्हणता येईल. ही एका ठिकाणी बसून राहण्याची ध्यानाची पद्धत भौतिक जीवनाच्या अत्यंत खालच्या पातळीसाठी सांगितली गेली आहे. सर्वप्रथम एखाद्याने चिंतन करावे, "मी हे शरीर आहे का?" मग विश्लेषण करावे. तुम्ही पाहणार, "नाही. मी हे शरीर नाही. मी या शरीरातून वेगळा आहे." मग आणखी चिंतन : "जर मी शरीर नाही, तर या शरीराच्या क्रिया कशाप्रकारे घडत आहेत? ते त्या सूक्ष्म कणाच्या, माझ्या अस्तित्वामुळे घडत आहे. हे शरीर कशाप्रकारे वाढत आहे? माझ्या अस्तित्वामुळे. अगदी या मुलाप्रमाणे, या मुलाचे शरीर आता लहान आहे. मग या मुलाचे शरीर जवळपास चोवीस वर्षाचे असताना अगदी धष्टपुष्ट होईल. आताचे हे लहान शरीर जाईल, नवीन शरीर येईल. हे कसे शक्य होत आहे? त्या आत्म्याच्या लहानशा कणाच्या अस्तित्वामुळे. पण जर तो लहानसा आत्मारूपी कण काढून घेतला किंवा निघून गेला, तर हे शरीर वाढणार किंवा परिवर्तित होणार नाही. हे ध्यानाचे विषय आहेत. पण जेव्हा तुम्ही "मी हे शरीर नाही. मी आत्मा आहे." या जाणिवेच्या पातळीवर येता, तेव्हा पुढची पायरी असेल की "या आत्म्याचे कार्य काय आहे?" ते कार्य आहे कृष्णभावना, कृष्णभावनेत कार्य करणे. त्यामुळे आताच्या काळात आपण प्रत्यक्ष आत्म्याचे कार्य स्वीकारायला हवे; मग इतर गोष्टी आपोआप कळतील. या काळात हे शक्य नाही की तुम्ही एकांतात जा व तेथे शांतपणे बसून ध्यान करा... या काळात ते शक्य नाही. ते अशक्य आहे. जर तुम्ही कृत्रिमपणे प्रयत्न करणार, तर अपयशी ठराल. त्यामुळे तुम्ही या पद्धतीचा स्वीकार करायला हवा,

हरेर्नाम हरेर्नाम
हरेर्नामैव केवलम् ।
कलौ नास्त्येव नास्त्येव
नास्त्येव गतिरन्यथा ।।
(चै. च. अादि १७.२१)

या कलियुगात हरेकृष्ण या हरिनामाच्या कीर्तनाव्यतिरिक्त आत्मसाक्षात्काराचा अन्य कोणताही मार्ग नाही. हे एक खरे व्यावहारिक तथ्य आहे.